
सावंतवाडी : न्हावेली गावातून जाणाऱ्या सावंतवाडी-रेडी या राज्य मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. गेले काही दिवस न्हावेली परिसरात अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामस्थांच्या माध्यमातून बांधकामचे उपकार्यकारी अभियंता वैभव सगरे यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजनमधून निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ हे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासन श्री.सगरे यांनी दिले.
या राज्यमार्गावर अन्य ठिकाणी गतिरोधक उभारण्यात आले आहेत. परंतु, न्हावेली गावातून जाणाऱ्या दोन किलोमीटरचा भाग वगळण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होत आहेत. या मार्गावर एक प्राथमिक शाळा, तसेच ७० ते ८० घरे लागून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याठिकाणी बऱ्याच वेळा अपघात होतात. हे प्रकार रोखण्यासाठी लवकरात-लवकर योग्य ती उपायोजना करा, अशी मागणी श्री. पार्सेकर यांनी केली. यावेळी याबाबत पाठपुरावा करून जिल्हा नियोजन मधून निधी प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्थांची मागणी लवकरच पूर्ण केली जाईल असे आश्वासन बांधकाम अधिकारी श्री. सगरे यांनी दिले. याप्रसंगी राज धवण, विठ्ठल परब, दिपक पार्सेकर,अनिकेत धवण, सिद्धेश धवण, कुणाल पार्सेकर, प्रथमेश आरोंदेकर, पुनीत नाईक, सौरभ पार्सेकर, ओम पार्सेकर उपस्थित होते.