केंद्रशाळा आरे-देवीचीवाडी देवगड तालुक्यात प्रथम

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान'
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 05, 2024 12:10 PM
views 126  views

देवगड : 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियान' 2024 मध्ये केंद्रशाळा आरे-देवीचीवाडी या  शाळेने देवगड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान' 29 जुलै ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये राबविण्यात आले.मूल्यांकनातून सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या तालुक्यातील तीन क्रमांकाची  निवड करण्यात आली. त्यामध्ये जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा आरे-देवीचीवाडी शाळेने देवगड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 

     शाळेने केलेली वर्ग सजावट, वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन, इमारतीची रंगरंगोटी, बोलक्या भिंती, बाल मंत्रिमंडळ कामकाज, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, विद्यान्जली पोर्टलद्वारा शालेय गरजांची पूर्तता,ऑनलाइन प्रशिक्षण, परसबाग, मेरी माटी - मेरा देश हा उपक्रम, विद्यार्थी बचत बँक, नव साक्षरता अभियान, विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, महावाचन चळवळ, परिसर स्वच्छता, स्वच्छता मॉनिटर उपक्रम, विद्यार्थी आरोग्य तपासणी, क्रीडा स्पर्धा, प्लास्टिक मुक्त शाळा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्याचे नियोजन, कचऱ्यापासून कंपोस्ट खत,  विद्यार्थी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, तंबाखूमुक्त शाळा इत्यादी उपक्रम शाळेने यशस्वीरित्या राबविले. 

यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. शमिका लोके, उपाध्यक्ष श्री. राजू कदम, सरपंच सौ. ममता कदम, उपसरपंच श्री. रत्नदीप दयाळ कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. महेश पाटोळे, पोलीस पाटील श्री. राजेंद्र कदम, श्री. राजेंद्र मेस्त्री, श्री. केतन आचरेकर, श्री.संजय कदम शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ, ग्रामपंचायत आरे, पालक वर्ग, ग्रामस्थ, शालेय पोषण आहार स्वंयपाकी सौ. मालंडकर आणि श्रीम. कोळंबेकर, अंगणवाडी सेविका सौ. कोकम बाई  यांचे बहुमोल सहकार्य लाभले. शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रमदान करून, आर्थिक सहकार्य करून जे पाठबळ उभे केले त्याची फलश्रुती म्हणजे शाळेला लाभलेली हे उत्तुंग यश होय. अशी भावना श्री. पी. एस. जाधवर मुख्याध्यापक यांनी व्यक्त केली आहे. शिक्षक, पालक, ग्रामस्थ मिळून परस्परांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांचा, शाळेचा आपण विकास करू शकतो. शाळेला नावारूपाला आणू शकतो. अशा भावना सौ. शमिका लोके यांनी व्यक्त केल्या.