राष्ट्रवादी श. प. जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 13:26 PM
views 19  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सावंतवाडी तालुक्यात सुरूवात झाली आहे. कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डोंगरपाल, नेतर्डे गावांमध्ये सौ. घारे यांनी आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्कांचा जागर या यात्रेच्या निमित्त केला जात आहे. निश्चितच लोकांचे हक्क त्यांना प्राप्त करून देण्यासाठी माझे शर्थीचे प्रयत्न राहतील‌ असे मतप्रदर्शन अर्चना घारे-परब यांनी यावेळी केले. जाणीव जागर यात्रेवेळी त्या बोलत होत्या. 

सौ. घारे म्हणाल्या, आपले मूलभूत हक्क, आरोग्याच्या चांगल्या सुविधा, स्वतःच्या गावी स्वतःच्या तालुक्यात हाताला रोजगार, स्वयंरोजगार, शेतीमालाला हमीभाव, सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यांना थांबे, विजेची समस्या, मच्छीमार बांधवांच्या समस्या अशा असंख्य समस्या आहेत. हे सगळे आमचे हक्क आहेत. आमच्या हक्काच जे आहे ते आम्हाला प्राप्त झाले पाहिजे. लोकांच्या हक्कांचा जागर करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील गावागावात जात असताना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे‌. आरोग्य, रोजगार, रस्ते, पूल याबाबत ग्रामस्थांसह महिला आपल्या व्यथा मांडत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली शक्ती सोबत असून लोकशाहीमध्ये आपल्याला ताकद दिली आहे. मतदानाच्या अधिकाराच्या रूपाने त्या शक्तीची, त्या ताकतीची देखील जाणीव सौ. घारे यांनी लोकांना करून दिली. डोंगरपाल, नेतर्डे येथे रात्री उशिरा सुद्धा यात्रेला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला. 

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष  पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालुका अध्यक्ष प्रदीप चांदेलकर, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, दोडामार्ग शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, दोडामार्ग महिला तालुकाध्यक्ष ममता नाईक, उल्हास नाईक, संजय भाईप, सुभाष लोंढे, युवक अध्यक्ष विवेक गवस, गौतम महाले, युवती अध्यक्ष सावली पाटकर, सुनीता भाईप, मिताली परब, उपसरपंच आरोही गवस, ऋतिक परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.