सावंतवाडी : ज्या माणसांवर मी उपकार केले त्यांना उपकाराची जाणीव नाही. त्यामुळे त्या माणसाला येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीची जनता उत्तर देईल, असा हल्लाबोल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी करत खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते..
कोकणातील विकासकामांचे श्रेय विनायक राऊत नारळ फोडून घेत आहेत. खरे तर त्यांनी काहीच केले नाही. अन् मी नारळ फोडणारा माणूस नाही. मी येथे नसताना खासदार येथे येऊन माझ्यावर बरेच बोलले.मला त्यावेळी शरद पवार यांची साथ सोडताना वाईट वाटले होते. पण मला माझा लढा सोडायचा नव्हता. मी बाळासाहेबांच्या विचारांमुळे शिवसेनेत गेलो. तुम्ही येथे येऊन काय केले ? माझ्याबाबत तुम्ही बोलू नका शरद पवार बोलतील असे ते यावेळी बोलताना म्हणाले. तर उपकाराची जाणीव नसणाऱ्याना सावंतवाडीची जनता उत्तर देईल असं ते म्हणाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, रूपेश पावसकर आदी उपस्थित होते.