
कणकवली : असलदे गावात सरस्वती हायस्कुल नांदगाव या स्कुलच्या पाठीमागील भागात एक बिबट्या मादी व दोन पिल्ले असे तीन बिबटे वावरत आहेत. शाळेतील मुले त्या परिसरात असतात. तसेच असलदे - धनगरवाडी नदीकिनारी व गावठाण दिवानसानेवाडी भागात या बिबट्यांचा वावर सुरु आहे. या बिबट्यांना सापळा लावून पकडावे , अशी मागणी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्याकडे सोसायटी चेअरमन भगवान लोके , माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सरपंच चंद्रकांत डामरे यांनी केली आहे.
दरम्यान, देवगड निपाणी महामार्गालगत शेतकरी गोविंद महादेव पारकर यांच्या गायीच्या वासराला बिबट्या मादीने ठार मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. तसेच असलदे - गावठाणवाडी येथील दोन वासरांना बिबट्याने गेल्या दोन महिन्यांत ठार केले आहे. त्याठिकाणी देखील बिबट्या मादीचा वावर होत असल्याने शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. असलदे उगवतीवाडी , मधलीवाडी , डामरेवाडी या भागातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना या बिबट्या मादीचा वावर असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. काही कुत्र्यांवर या बिबट्याने हल्ला केला आहे. तसेच असलदे ओझर येथील जंगलात आर्सिया काझी यांच्या शेळ्यांच्या कळपावर चार दिवसांपूर्वी या बिबट्या मादीने हल्ला केला आहे. या संदर्भात सातत्याने वनविभाग यांच्याकडे कळवूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे असलदे गावातील बिबट्या मादीच्या या त्रासामुळे शेतकरी भयभीत झालेले आहेत. शेतकरी व नागरिकांवर जीवघेणा हल्ला होण्यापूर्वी कणकवली वनविभाग कार्यालयाकडून तातडीने सापळा लावत बंदोबस्त करावा , अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा असलदे गावातील शेतकऱ्यांच्या वतीने सोसायटी चेअरमन भगवान लोके , माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सरपंच चंद्रकांत डामरे यांनी दिला आहे.










