
सावंतवाडी : कबूलायतदार जमीन लवकरच वाटपासाठी उपलब्ध करून देणार असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांना दिले. आंबोली येथे मंत्री बावनकुळे आले असता त्यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
आंबोली, चौकूळ व गेळेतील कबूलयतदार जमिनीवरील वन विभागाची नोंद लवकरच रद्द करून या जमिनी लवकरच वाटपासाठी उपलब्ध करून देणार आहे. आंबोली सरपंच यांनी निवेदन देत गावाची सामाजिक परिस्थिती वर्णन केली. हा विषय सुमारे 30 वर्षे प्रलंबित राहिल्यामुळे येथील ग्रामस्थ मंडळीना होणाऱ्या त्रासाबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी आंबोली सरपंच सावित्री पालेकर, आंबोली प्रमुख गावकर शशिकांत गावडे, आंबोली तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे, संतोष पालेकर आदी उपस्थित होते. तसेच प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सर्कल श्री. यादव, तलाठी मुळीक व इतर महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.