जालना मराठा समाज लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या पोलिसाला निलंबित करा : अॅड. सुहास सावंत

Edited by:
Published on: September 05, 2023 13:51 PM
views 138  views

कुडाळ : जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा. व पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी चार्ज प्रकरणाची उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा अशी मागणी सिंधुदुर्ग मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष वकील सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांनी तहसीलदारांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे निवेदना द्वारे केली आहे. मराठा समाजाचे निवेदन नायब तहसीलदार संजय गवस यांना देण्यात आले.

मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ज्या पद्धतीने मराठा समाजाचे मोर्चे निघतात तसेच अन्यही समाजाचे मोर्चे निघतात जर ते मोर्चे शांततेत निघणार असतील तर त्यासाठी  शासनाने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे. यावेळी धिरज परब, भास्कर परब, मिलिंद परब, सचिन काळप, अनिल सावंत, सुनील सावंत, वैभव जाधव आदी मराठा बांधव उपस्थित होते.

मराठा समाजाचे आंदोलन शांततेत सुरू होते, ज्या पोलिसांने अमानुषपणे लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला त्याला सुट्टीवर नं पाठवता त्याला तत्काळ निलंबित करा व या सर्व प्रकरणाची चौकशी शासन पोलीस प्रशासनाकडून करू पाहत आहे. त्यामुळे याला मराठा समाजाचा विरोध असून मराठा आंदोलकांवरील झालेल्या लाठीचार्जची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांचे निवेदन   कुडाळ नायब तहसीलदार संजय गवस यांना देण्यात आले व आमचे निवेदन शासन दरबारी सादर करा अशी मागणी करण्यात आली.