
सावंतवाडी : शहरातील आजपर्यंतच्या कार्यकाळात अनेक सामाजिक कार्यकर्ते मंत्रीपदावर विराजमान झालेत. परंतु सर्व सुविधांनी उपयुक्त असे एकही रुग्णालय आजपर्यंत उभारण्यात आले नाही. तरीही सावंतवाडी शहरातील नामांकित डॉक्टर्सनी आजपर्यंत येथील जनतेला अतिशय उत्कृष्ट रुग्णसेवा दिली आहे. तसेच औषधोपचारांची सुरळीत सेवाही स्थानिक मेडिकल स्टोअरमधून उपलब्ध असतानाही शहरातील एका 'मुन्नाभाई एमबीबीएस' च्याच हातून रुग्णाला इंजेक्शन दिले गेल्यामुळे बरेच रुग्ण दगावल्याची चर्चा आज सावंतवाडी शहरातील परिसरात नागरिकांमधून होत आहे.
पूर्वीचे मोठे नाव असल्याने शहरातील रुग्ण या 'मुन्नाभाई'कडे उपचारासाठी गेला असता त्याला इंजेक्शन देण्यात येत. त्यातच रुग्णाची हालचाल मंदावते, आणि मग मात्र इतर कोणताही पर्याय नसल्याने गोवा येथील रुग्णालयात दाखल करावेच लागते. परंतु २४ तासाच्या आत संबंधित रुग्ण दगावल्याचे निदर्शनास येत. अशा बऱ्याच घटना मुन्नाभाईच्या उपचारादरम्यान आजूबाजूच्या परिसरात घडल्या आहेत. परंतु आजपर्यंत कोणीही आवाज उठवला नाही. कृपया स्थानिक नागरिकांनी या 'मुन्नाभाई एमबीबीएस'च्या उपचार पद्धती बाबत सतर्क राहावे, असे जाहीर आवाहन मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनेतर्फे पत्रकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.