शक्तीशाली सुरूंग स्फोटामुळे मांगवलीतील घरांना तडे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 14, 2024 14:45 PM
views 334  views

वैभववाडी : अरुणा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम करताना शक्तीशाली सुरूंग स्फोटामुळे मांगवलीतील काही घरांना तडे गेले आहेत. सुरूंगामुळे बसणाऱ्या हादऱ्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.यासंदर्भात काही ग्रामस्थांनी तहसिलदारांकडे धाव घेतली आहे. अरूणा मध्यम पाटबंधारेच्या कालव्याचे काम सध्या सुरू आहे.या कालव्याची खोदाई करताना काही ठिकाणी सुरूंग स्फोट करण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांपासुन हे प्रकार सुरू असुन सुरूंगाच्या जोरदार हादऱ्यामुळे मांगवलीतील राणेवाडी,लिंगायतवाडी,भटवाडी या तीन वाडीतील काही घरांना तडे गेले आहे.सुरूंगामुळेच हे तडे जात असल्याचा दावा ग्रामस्थांकडुन केला जात आहे.दरम्यान सध्या या भागात होत असलेल्या सुरूंगामुळे गावात जोरजोरात हादरे बसत असल्याचे ग्रामस्थांकडुन सांगीतले जात आहे.

यासंदर्भात काही ग्रामस्थांनी तहसिलदारांकडे सुरूंग स्फोटाने झालेल्या नुकसानीबाबत तक्रार दिली आहे.घराच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी देखील त्यांनी केली असुन झालेली नुकसानभरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी देखील केली आहे.