ऐतिहासिक जत्रोत्सवास सुरुवात ; राजघराण्यानं घेतले आशीर्वाद

Edited by: विनायक गावस
Published on: November 19, 2022 18:10 PM
views 411  views

सावंतवाडी: सावंतवाडी अर्थात सुंदरवाडी परमेश्‍वराला पहाटेच्या वेळी पडलेले गोड स्वप्न. भारतातील ४८ संस्थानांपैकी एक म्हणजे हे सावंतवाडी संस्थान. या संस्थानच्या सावंत-भोसले घराण्याचा समावेश इतिहासाला ज्ञात शुर योद्ध्यांमध्ये आहे. ४०० वर्षांचा इतिहास सावंतवाडी संस्थानला आहे. पहिले खेम सावंत हे शुर योद्धे होते. त्यांनी आपल्या शौर्याने आजूबाजूचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणत चराठा हे राजधानीच ठिकाण ठरवल. नरेंद्र डोंगरावर राजवाडा उभारला. तर खेम सावंत दुसरे यांनी सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी शहर वसवत नवा कोट अर्थात आत्ताचा राजवाडा बांधला. या संस्थानमध्ये भोसले कुळात अनेक कर्तृत्ववान, पराक्रमी राज्यकर्ते होऊन गेलेत. रामचंद्र सावंत यांच्या निधनानंतर ‌पुत्र खेम सावंत तथा राजश्री यांना राज्याधिकार मिळाला. राजश्री तिसरे खेम सावंत हे विद्याप्रेमी, विद्येची अभिरुची असलेले एकमेव राजा होते. दानशूर राजा म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी अनेक लोकांना, देवस्थानांना जमिनी व रोख रकमा दिल्या होत्या. आज संस्थानात जी इनामे चालू आहे त्यातील बरीच इनामे ही त्यांच्या काळातील आहेत. त्यांच्या काळातील एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध देवस्थान श्री देव आत्मेश्वर देवस्थान. हे देवस्थान त्यांच्या कारकीर्दीतील असून मंदीरासमोरील तळीला देखील जाज्वल्य इतिहास आहे. 


या ठिकाणी भर दुपारी स्वतः राजे आणि त्यांचे सैन्य तहानेने व्याकूळ होऊन आले होते. याच ठिकाणी एक साधू ध्यानस्थ अवस्थेत बसले होते. ते साधू म्हणजे दामोदर भारती महाराज. राजांना तहान लागल्याचं समजताच भारती महाराजांनी हातातील त्रिशूळ जमिनीत मारला आणि भुमितून शूद्ध पाण्याचा गंगाप्रवाह वाहू लागला.‌ मंदीरासमोर ही आत्मेश्वर तळी असून ही तळी कधीही आटत नाही. राजांची कीर्ती दुरवर पसरली होती. त्यांची कारकिर्द ही संस्थांनसाठी सुखावह आणि भरभराटीची होती. हा काळ सावंतवाडीकरांसाठी संपन्नतेचा व वैभवाचा ठरला. खेम सावंत राजश्री हे वयाच्या ५४ व्या वर्षी २५ सप्टेंबर इ.स. १८०३ ला निवर्तले. माठेवाडा इथं संस्थानच्या पराक्रमी राजांची स्मारक उभारण्याची परंपरा आहे. याला 'माठे' असं संबोधलं जातं. याठिकाणी राजेसाहेब, सती गेलेल्या राणीसाहेब यांच्या माठी आहेत. या सर्वांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून प्रत्येक माठीची दैविकदृष्ट्या ख्याती आहे. स्त्री शक्तीचा जागर व संस्थानच्या वीर वंशजांची आठवण म्हणून  माठ्यांच्या ठिकाणी जत्रोत्सव साजरा केला जातो. याठिकाणी असलेल्या भागीरथीदेवी सावंत भोसले यांच्या माठीत सुहासिनी पूजा करतात. या ठिकाणी पूजा केल्याने पुण्य मिळते अशी श्रद्धा असल्याने  सुहासिनी याठिकाणी  दर्शनासाठी येतात. संस्थानचे पराक्रमी राजे लखम सावंत भोसले यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी भागीरथीदेवी सती गेल्या होत्या. त्यानंतर या माठीस जनतेनं दैवत्व दिल. भागीरथी देवीचे मंदिर हे तिसरे खेमसावंत भोसले यांच्या मंदिराच्या बाजूला आहे. सावंतवाडी संस्थानचे रामराजा  पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज, राजेसाहेब शिवरामराजे भोसले यांचे माठे देखील याच ठिकाणी आहेत.तिसऱ्या खेमसावंतांचे माठे हे दैविकदृष्ट्या प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी जत्रा भरते. सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील लोक या जत्रोत्सवास आवर्जून येतात. जिल्ह्यातील इतर जत्रा या रात्रभर चालतात. मात्र ही जत्रा दिवसा भरते. संस्थानच्या वीर वंशजांच स्मरण माठ्याच्या जत्रोत्सवात केल जात. सावंतवाडी शहरात होणारा हा एकमेव आणि ऐतिहासिक जत्रोत्सव मानला जातो. 


शनिवार मोठ्या उत्साहात हा जत्रोत्सव संपन्न झाला. संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी सहकुटुंब राजेसाहेब तिसरे खेम सावंत भोंसले यांचे आशीर्वाद घेतले. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, दशावतारी नाटक आदी यावेळी सादर केले. जत्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने खाज, खेळण्यांसह खाद्यपदार्थांची दुकान सजली होती. मोठ्या संख्येने नागरिक यावेळी माठेवाडा इथं उपस्थित होते.