मालवण : गेले काही दिवस काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने मालवणात बुधवारी रात्री पासून झोडपून काढण्यास सुरुवात केली. गुरुवारीही पावसाचा जोर कायम होता. शहरात काही ठिकाणी सखलं भागात पाणी साचले होते. शेतीसाठी हा समाधानकारक पाऊस असून भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
आधीच उशिरा आलेल्या पावसाने नंतर दमदार सुरवात केली होती. गडनदीने धोक्याची पातळीही ओलांडली होती. त्यामुळे कणकवली आणि मालवण तालुक्यातील खाडिकीनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सुदैवाने पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला होता. त्या काळात शेतीच्या कामांनीही वेग घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाने आपली दमदार वाटचाल सुरु केली आहे.