सावंतवाडी : बदलते हवामान, जीवनशैली आणि आहार यामुळे शहरी भागा प्रमाणेच ग्रामीण भागातही आरोग्याच्या समस्या उद्भभवत असून ग्रामीण भागातील लोकांनीही आपल्या आरोग्याच्या बाबतीत सजग राहून वेळोवेळी तपासणी करुन घेतली पाहिजे असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांनी केले. हुमरस ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात उदघाटनपर भाषणात ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अॅड नकुल पार्सेकर यांनी हुमरसचे अभ्यासू व सेवाभावी सरपंच सिताराम तेली हे गावाच्या सर्वागीण विकासासाठी गावामध्ये दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने विविध समाजपयोगी उपक्रम राबवत असून अशा कार्यकर्त्याला समाजाच्या विविध स्तरातून निश्चितच पाठिंबा मिळतो. अवघ्या बाराशे लोकवस्तीचं हे निसर्गसंपन्न गावं आदर्श गाव म्हणून भविष्यात निश्चितच नावलौकिक मिळवेल असा आशावाद व्यक्त केला. आपल्या मनोगतात सरपंच श्री तेली यांनी या आरोग्य शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. विशेष म्हणजे जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मा. निलेशजी सांबरे, पालघर यांच्या माध्यमातून जिजाऊ परिवाराचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते अॅड नकुल पार्सेकर यांनी सुमारे सव्वा लाख किमतीचे चष्मे शिबिरासाठी उपलब्ध करून दिले यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष आभार मानले.
आरोग्य शिबिराला सकाळपासून ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यामध्ये नेञतंज्ञ डॉ केळकर, स्ञिरोगतज्ञ सौ. गौरी गणपत्ये,दंततज्ञ कु. स्नेहल टक्केकर तसेच महालॅब सिंधुदुर्गचे कर्मचारी यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी उपसरपंच श्री प्रवीण वारंग, ग्रामसेवक श्री कुणबे,मुख्याध्यापिका सौ. तळवणेकर,ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री ज्ञानेश्वर सावंत, सौ. शलाका कवठणकर, श्रेया मेस्ञी,सोनिया कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.