
सावंतवाडी : मुंबई महानगरपालिकेच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे ''हर घर तिरंगा'' अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
यावर्षीही राज्यातील अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार असून आपल्या राष्ट्र ध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. नव्या पिढीत हीच प्रेरणा आणि विश्वास निर्माण करण्याचे काम हे अभियान करणार आहे असं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमानंतर पदयात्रा आणि सायक्लाथॉन यात्रेस हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यानंतर तिरंगा कॅनव्हासवर स्वाक्षरी करत घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेण्यात आला. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी व अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव उपस्थित होते.