सावंतवाडी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक दशकांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलने सुरू आहेत. शासनाला जाग यावी म्हणून कित्येक मराठा बांधवांनी प्राणांची आहुती दिली.
तरीही सरकार याबाबतीत गंभीर नाही हेच दिसून येत आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.
मराठा समाजासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला बळ मिळावे यासाठी सावंतवाडी तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी आज आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडी येथे बैठक पार पडली. या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जेष्ठ नेते विकास भोसले, सकल मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, अशोक दळवी व मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव-भगिनी उपस्थित होत्या.