कुडाळ : जालना अंतरवाली सराटी येथे मराठा समाजामार्फत मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने पुकारलेल्या मराठा आक्रोश आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचेच असताना आंदोलकांवर महायुती सरकार पुरस्कृत केलेला अमानुष आणि निंदनीय लाठीचार्ज हल्ला लांच्छनास्पद आहे. या निंदनीय घटनेला जबाबदार असलेले महायुती सरकार आणि गृहमंत्री यांचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करतोय. हा हल्ला पूर्व नियोजित असून मराठा आरक्षणाचा हक्क हिराऊन घेण्याच्या दडपशाही प्रवृत्तीचा केविलवाणा प्रयत्न महायुती सरकार करून मराठा आरक्षण दडपण्याचा प्रकार करत आहे. याची किंमत भाजपला भविष्यात चुकती करावीच लागेल अशी टीका सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, आगामी निवडणुकीत होणाऱ्या पराभवाची चाहूल लागल्याने भाजपची पाया खालची वाळू सरकत आहे. त्यामुळे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून आणि जातीय दंगल घडवून आगामी निवडणुकीत त्याचा लाभ उठविण्यासाठीच हा भाजप महायुतीचा केविलवाणा प्रयत्न सकल मराठा समाज हाणून पाडल्याशिवाय राहाणार नाही. सकल मराठा समाज आंदोलकांवर बेछूट झालेला लाठीचार्ज हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच झाला आहे. जालना अंतरवाली सराटी येथे मराठा समाज आक्रोश आंदोलन शांततेत सुरू होते,मात्र मराठा आरक्षण विरोधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठीमाराचा आणि अत्याचारी भाजप महायुती सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत असून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मराठा समाजाच्या पूर्णपणे पाठीशी आहे,असे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. यापुढे मराठा समाज आपल्या न्याय्य हक्कांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी भूमिका घेईल त्या भूमिके बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे अमित सामंत यांनी स्पष्ट केले.