
सावंतवाडी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात भरती प्रक्रिया २५ तारखेपासून सुरू होणार आहे. यामध्ये ८ हजार १६९ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मदत करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिली. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यात ८ हजार १६९ रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ जानेवारी पासून सुरू होणारं आहे. यावेळी हे अर्ज भरण्यासाठी युवक-युवतींना आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून मदत करणार आहोत. तरी या संधीचा फायदा बेरोजगारांना घ्यावा असे आवाहन अर्चना घारे-परब यांनी केले.
दरम्यान, शहरात गेली दोन वर्षे नाक्या-नाक्यावर दारू तसेच अंमली पदार्थ विकले जात आहेत. घरपोच डिलिव्हरी सुद्धा दिली जत आहे. याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष असून नोकऱ्या नसल्यामुळे तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळली आहे. त्याचा फायदा हे अवैध धंदे करणारे घेत आहेत. हे सर्व प्रकार थांबणे गरजेचे आहे. यासाठी महिला राष्ट्रवादी आक्रमक भुमिका घेणार असून रस्त्यावर उतरण्याची देखील आमची तयारी आहे असा इशारा घारे-परब यांनी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, रत्नागिरी निरीक्षक चित्रा बाबर-देसाई, महिला शहराध्यक्षा ऍड. सायली दुभाषी, राकेश नेवगी, काशिनाथ दुभाषी, रिद्धी परब, रोहन परब आदी उपस्थित होते.