सावंतवाडी : मडगाव - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने ही रेल्वे महत्वपूर्ण ठरणार आहे. कोकण हा देशातील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. त्यामुळे 'वंदे भारत' एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग आणि रायगड हे दोन अतिरिक्त थांबे करावेत अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.जेणेकरून अधिकाधिक पर्यटकांना याचा लाभ घेता येईल. हे थांबे झाल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणास भेट देतील व त्याची पर्यटन वाढीस निश्चितपणे मदत होईल असं मत शालेय शिक्षणमंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.
वंदे भारतला कोकणात कणकवलीत थांबा देण्यात आला आहे. यातच महाराष्ट्राचा शेवटच रेल्वे स्थानक सावंतवाडीत देखील वंदे भारतला थांबा मिळावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटना व सावंतवाडीकरांच्या वतीनं करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिंधुदुर्ग आणि रायगड हे दोन अतिरिक्त थांबे करावेत अशी मागणी केली आहे.