
दोडामार्ग :
आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाला नाविन्याची कास आहे, आपल जीवन समृध्द व सुखकर बनविण्यासाठी
माणसाला आता तंत्रज्ञानात सुद्धा अमुलाग्र बदल हवे आहेत. त्यामुळे आपल्या शिक्षक व मुलांनी वीज्ञानाचा वापर करून जगात देश व जागतिक हितासाठी सातत्याने विविधांगी प्रयोग करावेत. त्यातून नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लाववा,व आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर झळकावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विवेकानंद नाईक यांनी केले.
ते पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयात आयोजित ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलन करून या विज्ञान प्रदर्शनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी मुख्याध्यापक अन्वर खान, जिल्हा बँकचे माजी संचालक प्रकाश गवस, जि. प. चे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, शिक्षणाधिकारी योजना प्रदीपकुमार कुडाळकर, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जाधव, बांदा नवभारतचे सहसचिव नंदकुमार नाईक, विस्तार अधिकारी दीपा दळवी, मुख्याध्यापक स्नेहल गवस, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष संतोष घोगळे, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष शाबी तुळसकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. नाईक पुढे म्हणाले की, आपण यापूर्वीही अनेक विज्ञान प्रदर्शनांच्या कार्यक्रमांना गेलो. मात्र बऱ्याचदा आपल्याला तेच - तेच प्रयोग पहावयास मिळाले. त्यामुळे तसे न करता शिक्षक व विद्यार्थ्यांनी काळानुरूप वैज्ञानिक प्रयोगात बदल करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवून नाविन्याचा स्वीकार केला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आजवर जगभरात ज्या शास्त्रज्ञानी वेगवेगळे शोध यापूर्वी लावले आहेत, त्यांच्याकडे काही वेगळी शक्ती नव्हती तेही सामान्य मनुष्यच होते. पण त्यांनी आपल्या बोद्धीक क्षमतेचा अचूक वापर करून देशहिताचे अनेक शोध लावलेत. तशाच प्रकारे मुलांनीही त्यांचे विचार, त्यांचे परिश्रम अंगीकारावे व असे नवनवीन शोध लावावेत व देशप्रगतीत हातभार लावावा असे आवाहन केले.
अन्वर खान यांनी बोलताना सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती ही सामान्य मनुष्याला थक्क करणारी आहे. अस एकही क्षेत्र नाही की तिथे तंत्रज्ञान नाही आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हे तंत्रज्ञान आपल्या जीवनात अंगीकारावे व नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करावा असे नमूद केले. यावेळी अंकुश जाधव, महेश धोत्रे, प्रकाश गवस, नंदकुमार नाईक, प्रदीपकुमार कुडाळकर आदींनी आपले मनोगते व्यक्त केली. या विज्ञान प्रदर्शनात एकूण 58 मॉडेल आली आहेत. गटशिक्षणधिकारी निसार नदाफ यांनी आपल्या प्रस्ताविकातून विज्ञान प्रदर्शनाचे महत्व विद्यार्थ्यांच्या जीवनात कसे आहे. तंत्रज्ञान आणि खेळणी हा विषय या प्रदर्शनाला का देण्यात आला याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक परेश देसाई यांनी केले. आभार मुख्याध्यापक स्नेहल गवस यांनी मानले.