शालेय गुणवत्तेप्रमाणेच स्पर्धा परीक्षेतही यश मिळवा ! प्रा. रुपेश पाटील यांचे प्रतिपादन !

तळेरे विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 03, 2023 14:57 PM
views 181  views

कणकवली : आपला सिंधुदुर्ग जिल्हा शालेय गुणवत्तेच्या बाबतीत महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी आणि बारावी शालांत परीक्षेत आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही अव्वल दर्जाची असून हीच गुणवत्ता स्पर्धा परीक्षेतही दिसावी, त्यासाठी शालेय स्तरापासूनच तयारीला लागा व आपल्या आई-बाबांचे स्वप्न पूर्ण करा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी तळेरे येथे व्यक्त केले.

 तळेरे पंचक्रोशी शिक्षण मंडळ, मुंबई यांचे वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रा. रुपेश पाटील बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ. प्रकाश बावधनकर होते. व्यासपीठावर सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे,  उद्योजक नामदेव बांदिवडेकर, संस्थेचे चेअरमन अरविंद महाडिक, शालेय समितीचे सदस्य प्रवीण वरूणकर, शरद वायंगणकर, संतोष तळेकर,  संतोष जठार, दिलीप तळेकर, निलेश सोरप,  रमाकांत  वरूणकर, स्वप्निल कल्याणकर, मिथिल उबे,

प्राचार्य अविनाश मांजरेकर, ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत काटे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संस्था गीत अनावरण सोहळा संपन्न झाला. सदर संस्थेचे गीत डॉ. बावधनकर यांनी लिहिले आहे.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वर्गीय वामनराव (अप्पा) महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन करून वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात सुरुवात झाली.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते वर्षभरात विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा गुणवंतांची खाण 

दरम्यान प्रा. रुपेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्हा गुणवंतांची खाण आहे. कला व सांस्कृतिक क्षेत्रात येथील अनेक दिग्गजांनी आपल्या कार्याची पताका राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवली असून ही बाब समस्त कोकणवासियांसाठी गौरवास्पद आहे. मात्र अलीकडे गुणवत्तेची खाण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षेतील यश तेवढे समाधानकारक नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बावधनकर म्हणाले,  जीवन जगताना एक तरी कला आत्मसात करा, आपल्या अंगी संस्कृत भाषा असणे गरजेचे असून त्यामुळे आपली वाणी शुद्ध असते. तसेच सातत्याने प्रयोगशील रहा, असाही उद्देश डॉ.बावधनकर यांनी केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले तर वार्षिक आढावा व उपस्थितांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत काटे यांनी करून दिला. सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका पी. एम. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा कानकेकर यांनी केले.