
कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात मंगळवारी रात्रीच्या दरम्यान चार घरांच्या भिंतींना तडे गेल्याची घटना समोर आली आहे. मात्र हे तडे नेमके कशामुळे गेले हे अद्याप स्पष्ट झाले नसून आज बुधवारी सकाळी ही बाब सरपंच संजना आंग्रे यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी व अन्य लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दरम्यान बुधवारी सायंकाळी कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासहित मंडळ अधिकारी येंडे तलाठी माजी सभापती सुजाता हळदीवे घटनास्थळी दाखल होत. त्यांनी प्रत्यक्ष वस्तू स्थितीची पाहणी केली. परंतु भूकंप झाल्याची नोंद अधिकृतरित्या प्रशासन दरबारी नसल्याचे प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे हे देखील उपस्थित होते. भूगर्भशास्त्र यांना बोलवण्यात आले असून नेमका घरांना तडे जाण्याचे कारण काय याचा शोध घेण्यात येणार आहे.
त्यामुळे घरांना गेलेले तडे हे नेमके कशामुळे गेले त्याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे. असेही श्री देशपांडे यांनी सांगितले. घराच्या आसपास डोंगर भाग आहे का ही खातरजमा केली. परंतु सदरची तडे गेलेली घरे ही सपाट भागात असल्याचे तहसीलदारांकडून सांगण्यात आले. फोंडाघाट येथील रविंद्र सुरेश चव्हाण, दत्ताजी सुरेश चव्हाण, सोमनाथ सुरेश चव्हाण तसेच बाळू मारुती चव्हाण यांच्या घरांना तडे जाऊन नुकसान झाल्याचे समोर आले आहे. आज घडलेल्या घटनेची नोंद महसूल विभागाकडून घेण्यात आली असून याबाबतची अधिकची माहिती घेतली जात असल्याचे देखील श्री. देशपांडे यांनी सांगितले.











