कणकवली : सध्या जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांवर पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग नगरी एलसीबीच्या विभागाने कणकवली शहरात नाथ पै नगर येथील गडनदी रेल्वे ब्रिजच्या खाली गांजा विक्री करणाऱ्या तिघांना एलसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यातील एक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी वैभव सीताराम पांगम वय (25 वर्षे), स्वप्नील सुरेश कुडतरकर (वय 30 वर्षे), एक जण पसार झाला आहे.
एलसीबी पोलीस निरीक्षक भोसले यांनी स्वतः फिल्डवर उतरत ही कारवाई केली. एलसीबी पीआय भोसले यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, गुरू कोयंडे, गंगावणे, कृष्णा केसरकर यांनी ही कारवाई 27 जून रोजी मध्यरात्री 11 वाजून 30 मिनिटांनी केली.
आरोपींकडून 1 किलो 310 ग्राम चा 39 हजार रुपयांचा गांजा, एक मोटरसायकल, 2 मोबाईल, दोन चिलीम, वजनकाटा, रोख 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. हे दोन संशयित इसम नाटळ येथे राहणारे असून एवढ्या प्रमाणात त्यांच्याकडे गांजा कुठून आला कोणी दिला यामागे मोठे रॅकेट आहे काय ? कोण कोण याच्यामध्ये सहभागी आहेत.. याची माहिती कणकवली पोलीस गोळा करत आहेत.