खैरतोडीच्या गुन्ह्यात दोन फरार आरोपींना वनविभागाकडून अटक..!

क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात केली होती खैरतोड
Edited by: विनायक गावस
Published on: August 22, 2023 13:26 PM
views 519  views

सावंतवाडी : क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेल्या खैराची खोदून, तोड करत असलेल्या तीन आरोपींपैकी दोन फरार आरोपींना अटक करण्यात काल सायंकाळी वन विभागाला यश आले.

18 ऑगस्ट रोजी वनरक्षक इन्सुलि संग्राम पाटील व वनरक्षक कोलगाव सागर भोजने यांनी क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात खैरतोड करीत असलेल्या तीन आरोपींवर सायंकाळच्या दरम्यान झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला असता एक आरोपी ताब्यात मिळाला व इतर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यातील पकडला गेलेल्या आरोपीचे नाव लवू एकनाथ गावडे, रा.वेत्ये(वय-34) असे होते, तर गुन्हेस्थळावरून फरार झालेल्या दोन आरोपींची नावे संदीप रामा गावडे व विश्वास बाळा गावडे अशी असून दोघे ही रा. वेत्ये येथील होते.

काल सायंकाळच्या दरम्यान दोघा फरार आरोपींना वन विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले व तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली.  या अटक आरोपींना आज सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.अटकेची कारवाई ही उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस.नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल-पृथ्वीराज प्रताप, प्रमोद राणे, वनरक्षक-संग्राम पाटील, सागर भोजने, अप्पासो राठोड, चंद्रकांत पडते यांनी यशस्वीपणे पार पाडली.