दोडामार्ग : मोर्ले येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून काजू बागायातीचे मोठ नुकसान झालं. सुरेश लक्ष्मण गवस यांची जवळपास २०० कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस यांनी दिली आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, श्री. गवस यांच्या जमिनीत बीएसएनएलचा टॉवर उभारला आहे. ह्या टॉवरसाठी त्याठिकाणी एक विजेचा मीटर बसविण्यात आला. याच विजेच्या मीटरकडे मोठ्याने स्फोट होत शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. दुपारची वेळ असल्याने आग भडकली. त्यामुळे बागेतील काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यात सुमारे २०० काजू कलमे होरपळली. याच आठवड्यात काजु कलमांना बोंडू यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे उत्पन्न देणारी काजूची झाडे आगीत होरपळल्याने गवस यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.