
सावंतवाडी : गणेशोत्सवात चाकरमानी कोकणात येत असताना मुंबई-गोवा महामार्ग पुर्ण करता आला नाही हे राज्य सरकारचं फेल्युअर आहे. त्यामुळे कोकणातील चाकरमानी लोकांना सगळ्यात मोठ्या सणाला येताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी लगावला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, चाकरमानी कोकणात येत असताना मुंबई-गोवा महामार्ग पुर्ण करता आला नाही हे राज्य सरकारचं फेल्युअर आहे. याबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी योग्य ती भुमिका त्यांच्या स्टाईलने घेतली. ते बोलल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी प्रचंड आदळआपट केली. आज सरकारचीच लोक महामार्ग न झाल्याने नाराज आहेत. हे सरकारचं सांगत असून सरकारचे घटक पक्षच याबद्दल विचारणा करत आहेत. त्यामुळे कोकणातील चाकरमानी लोकांना सगळ्यात मोठ्या अशा गणेशोत्सव सणाला येताना प्रचंड हालअपेष्टा सहन करत यावं लागत. हे सरकारचं अपयश आहे असा खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी हाणला. यावेळी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते.