कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 19, 2025 16:21 PM
views 123  views

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय होऊन सव्वा वर्ष झाले तरी या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेतलेले नाही. आपल्या मागण्यांकडे शासनाकडून विलंब होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी आज पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन छेडले. 

         राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गेली १० वर्षे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याबाबत १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय झाला. मात्र या निर्णयाला आता सव्वा वर्ष उलटून गेले तरी या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. या कर्मचाऱ्यांना समावून घेण्याचा निर्णय प्रलंबित असतानाच नव्याने पदभरती केली जात आहे. हा एक प्रकारे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्यायच आहे. तसेच हे कर्मचारी अल्प मानधनात काम करत असून गेली ५ -६ महिने मासिक वेतन वेळेत न होता २-३ महिने थकीत राहतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे.

        समायोजन आणि दरमहा वेतन मिळावे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी १९ ते २२ ऑगस्ट या चार दिवसांचे कामबंद आंदोलन पुकारले आहे. आजपासून कामबंद करून हे कर्मचारी जिल्हा परिषद समोर एकवटले त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात ७०० हून अधिक कर्मचारी असून हे सर्व चार दिवसाच्या संपावर गेले असून त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. दरम्यान आपल्या मागण्यांसाठी राज्यात आजपासून बेमुदत काम बंद सुरू असून केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव असल्याने चाकरमानी जिल्ह्यात येणार असल्याने त्यांना आरोग्य सेवा देता यावी यासाठी जिल्ह्यात ४ दिवसाचे कामबंद करून शासनाचे लक्ष वेधण्यात येत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष हेमदिप पाताडे यांनी सांगितले.