
कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळाली असून त्यापार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या निर्देशानुसार शुक्रवारी विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने 'दुर्गोत्सव २०२५' साजरा करण्यात आला. फार्मसी कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी या १२ गडकिल्ल्यांच्या हुबेहूब, रेखीव आणि आकर्षक अशा प्रतिकृती कॉलेज परिसरात साकारण्यात आल्या.
या उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत, उद्योजक अजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतीची पाहणी केली.
वैभव नाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होणे ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीने 'दुर्गोत्सव २०२५' साजरा करून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून १२ गडकिल्ल्यांच्या साकारलेल्या प्रतिकृती हुबेहूब आणि खूपच सुंदर असल्याचे सांगत प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे माजी वैभव नाईक यांनी कौतुक केले.
यावेळी युवक कल्याण संघाचे खजिनदार प्रा. मंदार सावंत, प्राचार्य डॉ. राजेश जगताप, कु. राजवर्धन नाईक, उपप्राचार्य डॉ. अमोल उबाळे, विभागप्रमुख प्रा. अमर कुलकर्णी, प्रा. ऋषिकेश सोरटे, प्रा. नमिता सागवेकर, सौ. अदिती सावंत, प्रा. निशा करंदीकर, प्रा. नेहा गुरव, प्रा. शार्दुल कल्याणकर आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.










