सावंतवाडी : मडुरा-सातार्डा मार्गावर माऊली मंदिर जवळील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाले आहे. यासाठी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजना सावंत, माजी सभापती शर्वाणी गावकर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे गावात येऊन कुणीही आपण पुलाचे काम केले असे सांगत ग्रामस्थांकडून स्वतः ची पाठ थोपवून घेऊ नये, असा टोला मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी लगावला.
मडुरा माऊली मंदिर पुलाजवळी पुलासाठी समस्त पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अनेक बैठक, आंदोलन, उपोषणे करत निवेदने दिली होती. उपोषणादरम्यान माजी नगराध्यक्ष संजू परब व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, माजी सभापती शर्वाणी गावकर यांनी उपोषण स्थळी स्वतः भेट देत यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले होते. त्यानंतर स्वतः संजू परब यांनी मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना पुलाअभावी उद्भवणारा त्रास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिला. याची दखल घेत मंत्री चव्हाण यांनी तात्काळ सूत्रे हलवली अन पुलाचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे मडुरा गावात येऊन पुलाचे काम आपण स्वतः केले असे सांगत ग्रामस्थांकडून स्वतःची पाठ थोपवून फुक्याचे श्रेय कोणी घेऊ नये, असा टोला मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी लगावला.
दरम्यान, पंचक्रोशीने उभारलेल्या लढ्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी याची दखल घेत सदर काम मार्गी लावल्याचे बाळू गावडे यांनी सांगितले.