LIVE UPDATES

तिलारी - खराडी नदीपात्रातला 'तो' चौथरा कोसळला

तर्क वितर्काना उधाण
Edited by: लवू परब
Published on: June 16, 2025 20:30 PM
views 134  views

दोडामार्ग : तिलारी येथील खराडी  नदीपात्रात बांधकाम केलेला तो विहीर आकाराचा चौथरा एका बाजूने पावसाच्या सुरवातीलाच सोमवारी सकाळच्या सुमारास कोसळल्याने अनेक तर्क वितर्काना जोर आला आहे.  मुळात नदीपात्रात हा चौथरा का उभारण्यात आला. तो चोथरा की विहीर? मुख्य नदीपात्रात बांधकामाला परवानगी देता येते का? आणि ती दिली असेल तर ती कोणत्या विभागाने ? असे अनेक प्रश्न असताना याबाबत तहसीलदार व तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता,  आपल्याला याची काहीच कल्पना नसल्याचे सांगून हात वर केले आहेत. त्यामुळे तो चौथरा तथा विहीर नेमकी कशासाठी उभारली गेली? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.

दोडामार्ग ते विजघर राज्य मार्गावरील तिलारी मिनी काॅलनी येथील पुलाजवळ तिलारी नदीपात्रात मागील काही दिवसांपासून एका चौथऱ्याचे काम सुरू होते. तिलारी नदीपात्रात काम सुरू असल्याने ते एखादे शासकीय काम असेल म्हणून अनेकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. शिवाय जलसंपदा विभागाकडून नदीतील गाळ काढण्याचेही काम सुरू होते. त्यामुळे गाळ काढत असावेत असा कयासही बांधला गेला. मात्र पावसाच्या तोंडावर ते काम घाईगडबडीत उरकण्यात आले. त्यात तालुक्यात रविवारी  मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. घाट माथ्यावरही पावसाने तुफान फटकेबाजी केली. परिणामी तिलारी नदीतील पाणी प्रवाह वाढला. आणि नदीपात्रात पाण्याच्या जोरदार आलेल्या प्रवाहामुळे नदीपात्रातील चौथर्‍याचा अर्धा भाग कोसळला. या घटनेची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. मात्र एकाही विभागाचा अधिकारी अथवा तालुका आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी फिरकले नाही. त्यामुळे  सर्वसामान्यांनी आश्चर्य व्यक्त केल. नदीपात्रात कोणतीही स्थायिक रचना उभारणे हे नियमबाह्य आहे. विशेषतः ती सार्वजनिक जलस्त्रोतात अडथळा ठरल्यास अधिकच बेकायदेशीर ठरू शकते असेही  बोलले जात आहे. त्यामुळे या ढासळलेल्या बांधकाम बाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

दरम्यान, या चौथऱ्या बांधकामबाबत तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांना विचारले असता आपणास याबाबत काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत पूर्ण माहिती घेतली जाईल असे स्पष्ट केले. तर प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांना याबाबत विचारले असता त्यांनी देखील काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे चौथर्‍याच्या या कामाबाबत अधिकच संदिग्धता निर्माण झाली आहे. तसेच चौथर्‍याच्या कोसळलेल्या भागामुळे नदी प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पाणी आजूबाजूच्या घरात किंवा बागायतीत शिरले तर याला जबाबदार कोण? काम नियमबाह्य असेल तर प्रशासन काय भूमिका घेणार याबाबत ही प्रश्न उभे राहिले आहेत.