
दोडामार्ग : पावसाळ्यामध्ये वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा टाळण्यासाठी विद्युत वाहिनी सुरळीत करणेबाबत व कोनालकट्टा येथील महालक्ष्मी विद्युत कंपनीतून दोडामार्ग साठी वीज उपलब्ध करुन देणेबाबत दोडामार्ग उबाठा तालुका युवा सेनेच्या माध्यमातून तालुकाप्रमुख मदन राणे यांनी वीज वितरण चे उपअभियंता नलावडे यांच्याकडे लेखी निवेदन देत मागणी केली आहे.
युवासेना उपतालुकाप्रमुख संदेश गवस, युवासेना उपविभागप्रमुख कोनाळ विकी धरणे, युवासेना विभाग प्रमुख ऑलविन लोबो, युवासेना उप तालुकाप्रमुख सिद्धेश कासार यांच्या उपस्थितीत दीलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम भागात पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार वारंवार चाललेला असतो. हे दरवर्षीचेच झालेले असल्यामुळे येथील जनता त्रस्त झालेली आहे. दरवर्षी येणारी वाढीव बीले (सर्व प्रकारचे आकार) भरुन देखील सामान्य नागरीकांना सुरळीत वीज मिळत नसल्याने नागरीकांचे नुकसान होत आहे. दोडामार्ग तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी पावसाळ्यापुर्वी करावी लागणारी कामे म्हणजे वाहिनीवर असलेली धोकादायक झाडे झुडपे तोडून घेणे ही कामे तातडीने करावीत. तसेच दोडामार्ग तालुक्यात कोनाळकट्टा येथे निर्माण होणारी महालक्ष्मी विद्युत कंपनीची वीज तालुक्यासाठी उपलब्ध करुन द्यावी. लवकरच दहावी व बारावीच्या मिळाला नंतर विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयात वीज पुरवठा नियमित नसल्यास एका दाखल्यासाठी अनेक हेलपाटे मारावे लागणार आहेत. त्यामुळे वीज वितरण ने तालुक्यामध्ये वारंवार खंडीत होणा-या वीज पुरवठा नियमित करण्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.