देवगड : सम्यक प्रबोधिनी मुंबई गाव शाखेच्या वतीने दि.६ डिसेंबर रोजी जामसंडे बुद्धविहार येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सायंकाळी ६ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ते सांस्कृतिक केंद्रापर्यंत अभिवादन धम्म रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये धम्मबांधव, धम्म-भगिनी, बच्चे कंपनी मोठ्या संख्येनी उपस्थित होती.
त्यानंतर अभिवादन रॅलीची बुद्धविहार येथे सांगता झाल्यानंतर अभिवादन सभेत स. ह. केळकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. निलेश वानखेडे सर, के. एस.कदम सर, एम. के. जामसंडेकर सर या प्रमुख वक्त्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, २२ प्रतिज्ञांचा, जातीय व्यवस्थेतून निर्माण झालेल्या क्रांतीचा, बाबासाहेबांच्या विद्वतेचा, सन्मानाचा आणि दलित उद्धारासाठी केलेल्या अलौकिक महानकार्याचा आपल्या ओघवत्या भाषाशैलीतून मागोवा घेतला. यावेळी सम्यकच्या अध्यक्ष पूजा जाधव यांनी आपले विचार मांडले. यावेळी विचार मंचावर नगरसेविका मनीषा जामसंडेकर, गाव शाखेचे उपाध्यक्ष सुरेश जाधव, माजी अध्यक्ष एम. के. जामसंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव पंकज जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश जाधव यांनी केले. अभिवादन धम्म रॅलीच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद व युवा पिढीने परिश्रम घेतले. ५ डिसेंबर रोजी रात्री बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्याम जाधव, सुशील जाधव, मेघा जाधव यांनी भीम गीतातून विनम्र अभिवादनपर आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला हार्मोनियमची साथ पी.के. कदम यांनी दिली.