
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीची झालेली सर्वसाधारण सभा विकासाच्या मुद्द्यांपेक्षा आरोप-प्रत्यारोप, मान- अपमान या विषयावर सत्ताधारी व विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला व्यासपीठावर मुख्याधिकारी कांबळे, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, भाजपा गटनेते शरद टुकरूल, नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, ऋचाली पाटकर, अरुणा पाटकर, स्वरा कावले, आद्या गुमास्ते, मनीषा जामसंडेकर, नगरसेवक बुवा तारी, नितीन बांदेकर, व्ही. सी. खडपकर, संतोष तारी, रोहन खेडेकर आदी उपस्थित होते.
अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण करणार !
नगरपंचायतीमध्ये एका प्रभागात हॉट मिक्स रस्त्याची निविदा झालेली असताना, कोल्ड मिक्स रस्ते करण्यात आले आहेत. त्यांचे सखोल चौकशी होऊन त्या ठेकेदारांवर कारवाई करावी. त्या ठेकेदाराचे बिल अदा करू नये. तसेच, संरक्षक भिंतीला मंजुरी नसताना प्रभाग एक मध्ये आगाऊ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक बुवा तारी यांनी केली. संबंधितांवर कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी तारी यांनी दिला.
नगरपंचायतीमध्ये नळ योजना आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये नळ योजनेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव व ठराव देण्याचे सांगितले होते. मात्र, नगरपंचायतीने आमदारांना ठरावच पाठवला नसल्याने नळ योजना दुरुस्तीच्या कामासाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे, असा आरोप नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी केला. यावर आमदार राणेंनी एकही रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला नाही. हे आमदार राणे यांचेच अपयश आहे, अशी टीका बुवा तारी यांनी केली. आमदारांवरील
आरोपावरून दोन्ही सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. वैयक्तिक पातळीवरदेखील नगरसेवक घसरले.देवगड सडा भागामध्ये हॉटेलनिखिल समोर मोठ्या प्रमाणातअतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.घनकचरा व्यवस्थापनाचे नको ते साहित्य आहे कुठे? नगरपंचायतीच्या मालकीच्या खत मशीन, बॉटल, क्रश मशीन व अन्य साहित्य कोठे ठेवण्यात आले आहे, याची माहिती सभागृहाला देण्यात यावी, अशी मागणी प्रणाली माने यांनी केली.
शौचालयांसाठी आलेले अनुदान लाभार्थ्यांना तातडीने वितरीत करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांना गेले एक वर्ष ठेकेदाराकडून पेमेंट झालेले नाही. याबाबत नगरपंचायतीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी केली.