
देवगड : तिर्लोट येथील ग्रामपंचायतच्या नव्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इमारतीवरील फलकाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, ग्रामपंचायत हीच लोकविकास आणि ग्रामविकासाची केंद्रबिंदू संस्था आहे. ग्रामपंचायती सक्षम आणि बळकट झाल्या तरच गावांचा सर्वांगीण विकास साधता येईल. गावातील सर्व प्रशासकीय कामकाज एकाच छताखाली झाल्यास नागरिकांना सेवा देणे अधिक सुलभ होते. त्यामुळे सुसज्ज आणि सुस्थितीत ग्रामपंचायत इमारती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास देवगड तालुका सभापती गणेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, गटविकास अधिकारी श्री. चव्हाण, तसेच अमोल तेली, रवी पाळेकर, सरपंच सौ. रितिका रामकृष्ण जुवाटकर, उपसरपंच राजन मधुकर घाडी, मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, बाळ खडपे, जिल्हा परिषदेचे गटनेते संजय बोंबडी, भूषण पोकळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










