
वेंगुर्ला : वेंगुर्ला बंदर येथे २३ मे ला रात्री वादळी वाऱ्यामुळे छोटी होडी बुडून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ४ जणांच्या कुटुंबियांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मदतीचा हात दिला आहे. केसरकर यांनी आपल्या स्वखर्चातून या चारही जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. यातील ३ खलाशी हे परराज्यातील असून सुद्धा मंत्री केसरकर त्यांच्या मदतीसाठी सरसावले असल्याने याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली आहे.
वेंगुर्ला बंदर येथे झालेल्या घटनेत रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर (६६) व मध्यप्रदेश मधील खलाशी आझान मुनीलाला कोल (१८), चांद गुलाम महम्मद (१९), शिवराम कोल (२२) यांचा मृत्य झाला होता. यानंतर या होडीचे मालक दाभोसवाडा येथील बाबी रेडकर यांची २५ मे रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर भेट घेतली होती. यावेळी याबाबत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मंत्री केसरकर यांनी दिले होते. तसेच मयतांचे मृतदेह त्यांच्या घरापर्यंत पोचवण्याची व्यवस्थाही मंत्री केसरकर यांनी केली होती.
दरम्यान यातील ३ खलाशी जरी राज्य बाहेरील असले तरी याठिकाणी काम करताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांना जी काय मदत करता येईन ती केली जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले होते. यानुसार मंत्री केसरकर यांनी स्वखर्चातून या चारही खलाश्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली असल्याचे नितीन मांजरेकर यांनी सांगितले.