युवा शक्तीचं एकत्र येऊन सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत करण्याचे काम वाखाणण्याजोगं !

जय हनुमान मित्रमंडळाचं शिक्षणमंत्री केसरकरांनी केलं कौतुक
Edited by: विनायक गावस
Published on: November 15, 2023 16:56 PM
views 127  views

सावंतवाडी : सामाजिक विकासाबरोबर सांस्कृतिक विकासही महत्वाचा असतो. येथील युवा शक्तीने एकत्र येऊन सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत करण्याचे केलेले काम कौतुकास्पद आहे. लवकरच या औद्योगिकदृष्ट्या विकास करण्यासाठी पावले उचलली जातील. सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीच्या जागेवर मोठा प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. येथे प्रकल्प सुरु झाल्यानंतर असंख्य जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. प्रकलपाबत शिक्कामोर्तब झाल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दांडेली - आरोस बाजार येथे केले.जय हनुमान मित्रमंडळ दांडेली - आरोस बाजार येथे आयोजित केलेल्या दीपावली शो टाईमच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 


यावेळी व्यासपीठावर दांडेली सरपंच नीलेश आरोलकर, आरोस सरपंच शंकर नाईक, शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, केसरकर यांचे स्वीय सहाय्यक रामचंद्र आंगणे, माजी सरपंच संजू पांगम, बाळा मोरजकर, आदर्श शिक्षिका प्रा. सुषमा मांजरेकर, पत्रकार प्रवीण मांजरेकर, ग्रा. प. सदस्या उमा पांगम, पोलीस पाटील चतुर मालवणकर, प्रसाद नाईक, बाळा शिरसाट, राजन मालवणकर, योगेश नाईक, संदीप माणगावकर, संदीप पंत, रसिक दळवी, सिधेश मालवणकर आदी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस च्या शिक्षिका प्रा सुषमा मांजरेकर यांना महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व राष्ट्रीय शिक्षण धोरण सुकाणू समितीवर निवड झाल्याबद्दल शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन मंडलातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी केसरकर पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य आज वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कुठच्याही विकासासाठी निधी कमी पडू दिला जात नाही. केंद्र शासनाचा राज्याला भक्कम पाठिंबा आहे. या भागातील विकासासाठीही कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. येथील ग्रामपंचयतीने सुचवलेल्या सर्व कामांना मंजुरी दिली आहे. यापुढेही ग्रामपंचायतीने प्रस्ताव द्यावेत. तत्काळ मंजूर करण्यात येतील. येथील मित्रमंडळाची एकता कौतुकास्पद असून यापुढेही असाच एकोपा कायम ठेवावा व विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.

सत्काराला उत्तर देताना प्रा. सौ.मांजरेकर म्हणाल्या, हा सत्कार जरी मंडळातर्फे असला तरी मंडळाचे सर्वच जण माझे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांकडून झालेला हा माझा सत्कार मला खूप भावणारा आहे. माझ्या पुरस्कारात विद्यार्थ्यांचाही वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राणे, नाईक यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश नाईक, रसिक दळवी व श्रावणी नार्वेकर यांनी तर आभार संदीप माणगावकर यांनी केले. उद्घटनानंतर फॅन्सी ड्रेस व मिस रत्नसुंदरी या स्पर्धा झाल्या.