सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील दांडेली घोणसेवाडी व फणसमाडे नदीवर पक्का पुल बांधण्यात यावा अशी मागणी खासदार विनायक राऊत यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केली. ग्रामपंचायत दांडेली कार्यक्षेत्रामध्ये घोणसेवाडी व फणसमाडे या दोन वाड्यावर जाणारा नदीवर पूल होणे अत्यंत गरजेचे असून त्या ठिकाणी जवळ जवळ 300 -350 पर्यंत लोकसंख्या आहे. वाडीतील लोकांना थेट गावापर्यंत ये-जा करण्यासाठी हे साकव एकमेव साधन आहे. वाडीतील लोकवस्ती दाट असल्याने आजारी व्यक्तीना अन्य ठिकाणी नेण्यासाठी पावसाळ्यात गैरसोय होते. तसेच मुलांना पण जवळजवळ 2 कि.मी. वळसा घालून यावे लागते. त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच साकवावरुन चारचाकी वाहन जाणे शक्य नाही. या ठिकाणी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पक्के पूल होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी या पूलासाठी आपण निधी उपलब्ध करून दिल्यास वाहतुकीसाठी व राहदारीसाठी गैरसोय दूर होणारी आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यात यावी अशी मागणी अर्चना घारेंनी केली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, दर्शना बाबर-देसाई, सागर नाणोसकर आदी उपस्थित होते.