सावंतवाडी : नगरपरिषद समोर मोती तलावाच्या काठावर बसलेली एक व्यक्ती तलावात कोसळ्याची घटना शनीवारी आठ-साडेआठ च्या सुमारास घडली. मात्र, तब्बल दोन- अडीच तास होऊन देखील नगरपरिषद प्रशासन निद्रीस्त असल्याच पहायला मिळाल. तळ्यात पडलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी सांगेलीतून बाबल आल्मेडा यांची टीम सावंतवाडीत दाखल झाली. पोलीस यंत्रणा घटनास्थळी उपस्थित होती. मात्र, नगरपरिषद प्रशासन निद्रीस्त होत. यामुळे उपस्थित नागरिकांनी रोष व्यक्त केला.
तब्बल १ तास बाबल आल्मेडा टीमला बोटीसाठी प्रतिक्षा करावी लागली. मात्र, त्यानंतर देखील बोट न मिळाल्यानं व नगरपरिषदच सहकार्य न मिळाल्यानं बाबल आल्मेडा यांनी नाराजी व्यक्त करत सहकार्य मिळत नसेल तर यापुढे सावंतवाडीत येणार नाही असं वक्तव्य केल. त्यानंतर अगदी काही क्षणात नगरपरिषद कर्मचारी बोटीसह घटनास्थळी दाखल झाले. अगदी १५ ते २० मिनिटांत बाबल आल्मेडा आणि त्यांच्या टीमने मृतदेहाचा शोध घेतला. बाबल आल्मेडा यांनी प्रशासनाकडे मागण्या करूनही दखल घेत जातं नसल्याची खंत व्यक्त केली. मृत व्यक्ती ही चराठा येथील असून संतोष बाळकृष्ण मेस्त्री असं त्यांचं नाव असल्याची प्राथमिक माहिती ओळख पटविणाऱ्यांकडून देण्यात आली. यानंतर शवविच्छेदनासाठी हा मृतदेह नेण्यात आला.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी न.प. प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींचे नातेवाईक असते तर एवढा वेळ लावला असता का ? असा सवाल त्यांनी केला. सामान्य नागरिकांची किंमत प्रशासनाला नाही का ? असं मत व्यक्त करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर जिल्हा प्रशासनानं सामाजिक कार्य करणाऱ्या बाबल आल्मेडा व टीमला साधनसामुग्री पुरवण्यासह शासकीय सेवेत या टीममधील युवकांना भरती करून घ्यावं अशी मागणी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर, पोलिस उप निरीक्षक श्री. तेली, पोलिस कवीटकर, न.प. कर्मचारी दीपक म्हापसेकर आदि उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.