कुडाळ : तालुक्यातील आंब्रड सारमळे वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांच्या गाईचा मृत्यू झाला आहे. ही गाय मंगळवारी सकाळी जंगलमय भागात मृत सापडून आली याबाबत गाय मालक दत्ताराम गणपत दळवी रा आंब्रड, सारमाळे यांनी सदरील घटना कसाल परिमंडळ क्षेत्र वनपाल अनिल चव्हाण यांना कळविले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी जात पाहणी करत सदरील गाय बिबट्याच्या हल्ल्यात मदत झाल्याचे सांगितले. तर गाईचे मालक श्री. दळवी यांनी आपले आर्थिक नुकसान झाले असून वनविभागाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
याबाबत गायमालक दत्तराम गणपत दळवी यांनी सांगितले की सोमवारी संध्याकाळी गाय चारायला जंगलात घेऊन गेलो होतो. मात्र उशिरापर्यंत गाय आढळून आली नाही. व रात्री उशीर झाल्याने व काळोख पडल्याने गाईचा शोध घेता आला नाही. मंगळवारी सकाळी गाईचा शोध सुरू केला असता गाय जंगलमय भागात मृत आढळून आली. याबाबत वनपाल अनिल चव्हाण यांना संपर्क साधून कळविण्यात आले. कसाल परिमंडळ वनपाल अनिल चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता गाय बिबट्याच्या हल्ल्यात मयत झाली असल्याचे वनपाल अनिल चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी कसाल वनरक्षक प्रियंका पाटील, वर्दे वनरक्षक उत्तम कांबळे यांच्या सहाय्याने वनपाल अनिल चव्हाण यांनी पंचनामा केला असून शेतकऱ्यास झालेल्या नुकसानी बाबत भरपाई देण्यासाठी लवकरच अहवाल पशु विभागाकडे सादर करू असे सांगितले.