
वैभववाडी : वैभववाडी बाजारपेठेत पुन्हा उभारलेल्या ४० ते ४५ स्टॉलपैकी शासकीय गोदामानजीक असलेल्या नऊ स्टॉलधारकांना तहसिलदारंनी स्टॉल हटावची नोटीस बजावली आहे.नऊच स्टॉलधारकांना नोटीस दिल्यामुळे स्टॉलधारकांमध्येच सभ्रंम निर्माण झाला आहे.शहरातील सर्व स्टॉल हटविण्यात यावे अशी मागणी नगरपंचायतीने तहसिलदारांकडे केली होती.
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीने फेब्रुवारी २०२३ ला शहरात स्टॉल हटाव मोहीम राबविली होती.शहरातील काही रस्ते,गटार बांधकाम करण्यासाठी स्टॉल हटविणे आवश्यक असल्याचे सांगत ही मोहीम राबविली होती.शहरातील सुमारे १२० हुन अधिक स्टॉल नगरपंचायतीने हटविले होते.त्यानंतर स्टॉलधारकांसाठी कायमस्वरूपी स्टॉल उभारण्याचे नियोजन सुरू होते.त्या अनुषंगाने शहरातील सार्वजनिक शौचालयानजीक शुभारंभ देखील करण्यात आला होता.परंतु ती महसुल विभागाने बांधकाम करण्यास परवानगी नाकारली.दरम्यान जुन महिन्याच्या अखेरीपासुन शहरात काही स्टॉलधारकांनी स्टॉल उभे करण्यास सुरूवात केली.आतापर्यत शहरात ४० ते ४५ स्टॉल उभे राहीले आहेत.उर्वरित स्टॉलधारक देखील स्टॉल उभे करण्याच्या तयारीत होते.मात्र नगरपंचायतीने शहरात स्टॉल उभे करण्यास महसुल विभागाने परवानगी दिली आहे का अशी विचारणा तहसिलदारांकडे करीत परवानगी दिली नसेल तर स्टॉल हटविण्यात यावे अशी मागणी केली.नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाला तहसिलदार दिप्ती देसाई यांनी माहीती घेवुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगीतले.दरम्यान आता तहसिलदार सौ.देसाई यांनी ४५ स्टॉलपैकी नऊच स्टॉलधारकांना स्टॉल हटविण्याबाबत नोटीस दिली आहे.नऊच स्टॉलधारकांना नोटीस दिल्यामुळे स्टॉलधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे आता नगरपंचायत काय भुमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.या संदर्भात तहसीलदार सौ.देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, शासकीय गोदामानजीकची जागा महसुल विभागाची असुन या जागेत नऊ स्टॉल नव्याने झाले आहेत.या स्टॉलधारकांना नोटीस बजाविण्यात आलेली आहे.