
चिपळूण : चिपळूण शहरात दरवर्षी पुराची समस्या निर्माण करणाऱ्या नलावडे परिसरातील बंधाऱ्याचे काम अखेर पूर्ण झाले असून, यंदाच्या मुसळधार पावसात या बंधाऱ्याचा सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून आला आहे. या कामामागे आमदार शेखर निकम यांची दूरदृष्टी व सततचा पाठपुरावा हे मुख्य कारण ठरले आहे.
चिपळूणच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की, विधायक कामे सुरू झाल्यानंतर वर्षानुवर्षे त्यात प्रगती होत नाही. मात्र नलावडे बंधाऱ्याच्या प्रकरणात असे घडले नाही. अनेक वर्षे रखडलेल्या या कामासाठी आ. निकम यांनी महायुती शासनाच्या माध्यमातून विशेष निधी आणला आणि केवळ १० महिन्यांत हा बंधारा पूर्णत्वास नेला.
कालच्या मुसळधार पावसात नलावडे बंधारा परिसरात पाणी अडकले नाही, पूरजन्य परिस्थिती उद्भवली नाही, याचे श्रेय या नव्या बंधाऱ्याला जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. आ. निकम यांनी कोणताही गाजावाजा न करता, श्रेय न घेता, ‘जनतेचा सेवक’ म्हणून काम करत राहण्याचा आपला निर्धार कायम ठेवला आहे. त्यांची ही सच्ची लोकसेवा, साधेपणा आणि कार्यक्षमतेची दिशा सर्वांना प्रेरणादायी आहे.