
वेंगुर्ला : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज्यांचा पुतळा कोसळून स्मारकाचा जो अपमान झाला, तो छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सर्व छत्रपती प्रेमींचा अपमान आहे. घाईगडबडीत केलेल्या या स्मारकासाठी शासकिय निधीचा करोडो रुपयांचा चुराडा करून इव्हेंट करणाऱ्या सरकारचा उबाठा शिवसेना पक्षातर्फे जाहीर निषेध करत आहोत. असे मत ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी व्यक्त केले आहे.
या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मंगळवारी (२७ ऑगस्ट) वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेनेतर्फे शहरातील माणिकचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जमा होत पुरोहिताकरवी पुतळ्यावर अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब बोलत होते. त्यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रकाश गडेकर, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, शहर प्रमुख अजित राऊळ, शहर महिला संघटक मंजुषा आरोलकर, उभादांडा विभाग प्रमुख सुजित चमणकर, उपविभाग प्रमुख निलेश चमणकर, तुळस विभाग प्रमुख संदिप पेडणेकर, अल्पसंख्यांक सेल तालुका प्रमुख रफिक बेग, युवासेना तालुका प्रमुख मकरंद गोंधळेकर, आडेली उपविभाग प्रमुख आनंद दाभोलकर, किशोर नरसुले, अभिमन्यू भुते यासह शिवसैनिक उपस्थित होते.
या स्मारकाच्या दुर्दैवी घटनेला जे कोणी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, ठेकेदार, शिल्पकार तसेच नेव्हीचे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. अलिकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत घाईगडबडीत देशाचे पंतप्रधान यांनी मतांच्या राजकारणात या पुतळ्याचे अनावरण केले होते. पण नियतीला सुध्दा ते पटलेले नाही. असे दिसून आले आहे. त्यामुळे जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करून आपण खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी आहोत हे महाराष्ट्रासह देशातील शिव भक्तांना दाखवून हिंमत दाखवावी, असे आव्हानही त्यांनी केले.
या जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्ह्यात टँलेंट मंत्री म्हणून काम करताना त्यांचेच पालकत्व असलेल्या जिल्ह्यातील आणि देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते अनावरण झालेली शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळा निकृष्ट बांधकामामुळे कोसळावा म्हणजे प्रशासनावर वचक काय आहे ते जनतेनेच समजावे. अशी टीकाही यावेळी यशवंत परब यांनी केली.