मालवण राडा प्रकरणी ४२ ओळखीच्या - १०० अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल : पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 30, 2024 10:56 AM
views 419  views

सिंधुदुर्गनगरी : मालवण राजकोट किल्ल्यावर खासदार नारायण राणे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे समोरासमोर आल्यानंतर झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांना धक्काबुक्की करून जखमी करणे आदींसह विविध गुन्हे दाखल केले आहेत. यात ओळखीच्या 40 जणांबरोबरच अनोळखी शंभर जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याचा अधिक तपास मालवण पोलीस करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे दिली आहे.

मालवण राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणच्या परिसरात आरोपीत आल्यावर बेकायदा जमाव करुन आपले राजकिय पक्षाच्या हेतुने प्रेरित होऊन आपसात उपहासात्मक दोन्ही पक्षाच्या उभयत्याने आमने सामने आल्यावर घोषणेबाजी केली. पोलीस जमाव शांत करण्याचे कर्तव्य करीत असताना त्यांना धाकाने बोलून अटकाव करत होते. सदर बेकायदेशीर जमावातील कृत्यात 2 पोलीसांना दुखापत झालेली आहे. त्याचप्रमाणे राजकोट किल्याची तटबंदी ही सार्वजनिक संपत्ती असल्याचे माहित असतानाही तटबंदीवरील जांभे दगड काढून खाली फेकून देऊन नुकसान केलेले आहे.

त्यामुळे सदर 42 ज्ञात व 100 अनोळखी इसमांविरुध्द मालवण पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता- 2023 चे कलम -121/(2), 189(2), 191(2), 190, 118(2), 223 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 कलम 3, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37/1, 37/3, प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असून पुढील तपास मालवण पोलीस करीत आहेत.