गेळे जमीन प्रश्नावरून महायुतीत श्रेयवादाचा संघर्ष

भाजप - शिवसेनेत वाद
Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2025 18:03 PM
views 98  views

सावंतवाडी : गेळे येथील जमीन वाटपाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता महायुतीमध्येच श्रेयवादाचा संघर्ष पेटला आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात हा वाद सुरू झाला असून, दोन्ही पक्षांचे नेते हा प्रश्न आपल्या नेत्यामुळेच सुटल्याचा दावा करत आहेत.

गेळे येथील जमीन प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर हा प्रश्न सुटल्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या यशानंतर भाजपचे नेते संदीप गावडे यांनी या प्रश्नावर भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनी लक्ष घातल्यामुळेच तो सुटल्याचा दावा केला आहे. त्यांनी चव्हाण यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत भाजपच्या भूमिकेवर जोर दिला. तर दुसरीकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी या प्रकरणात तात्काळ पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, हा प्रश्न माजी मंत्री आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे सुटला आहे. केसरकर यांनी मंत्री, प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही गोष्ट शक्य झाली असे परब यांनी सांगितले.

या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या परस्परविरोधी दाव्यांमुळे स्थानिक राजकारणात श्रेयवादाचा वाद चिघळला आहे. महायुतीमधील हे दोन प्रमुख पक्ष एकाच प्रश्नाचे श्रेय घेण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संघर्षामुळे महायुतीच्या एकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक पातळीवर याचा परिणाम दिसून येत आहे.