LIVE UPDATES

सावंतवाडीत भाजपचा उद्योजक - व्यावसायिक संवाद सभा

'विकसित भारताचा अमृतकाळ'
Edited by: विनायक गांवस
Published on: June 19, 2025 20:39 PM
views 118  views

सावंतवाडी : भारताला २०४७ पर्यंत महासत्ता बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सावंतवाडी येथे 'विकसित भारताचा अमृतकाळ' या विषयावर उद्योजक व व्यावसायिक संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. राजवाडा येथील सभागृहात झालेल्या या सभेत भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना आमदार रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांत केलेल्या 'चौफेर' कामाचे आणि देशाला 'अमृतकाळात' आणल्याचे विशेष कौतुक केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सुरु झालेला मोदींचा प्रवास देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून, काश्मीरमध्ये तिरंगा फडकवून त्यांनी राष्ट्रभक्तीचे प्रतीक प्रस्थापित केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 'घर घर तिरंगा' मोहिमेतून राष्ट्रभक्ती प्रत्येक मनात रुजविण्याचे काम मोदींनी केल्याचेही ते म्हणाले.

रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर प्रकाश टाकला. देशातील अन्न साठवणूक क्षमता वाढवून गोरगरिबांना धान्य वाटप करण्याचा निर्णय, लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने थेट लाभ देण्याची योजना, आणि भारताला लोडशेडींगमुक्त करण्यासोबतच प्रदूषण नियंत्रणासाठी सौर ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर भर देण्याचे त्यांचे निर्णय हे विकासाच्या दिशेने टाकलेली पाऊले असल्याचे त्यांनी सांगितले. 'मेक इन इंडिया' अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तानच्या हल्ल्यांना परतवून लावल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच्या महत्त्वपूर्ण घोषणा करताना, रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील पाटबंधारेचे सहा प्रकल्प पुन्हा मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच, पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचे धोरण असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षण, आरोग्य, खेळ, व्यवसाय आणि उद्योग यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये देशाची प्रगती व्हावी या दृष्टीने मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेताना, २०४७ पर्यंत भारत महासत्ता बनविण्याच्या त्यांच्या संकल्पाला प्रत्येक भारतीयाने पाठिंबा दिला पाहिजे असे ते म्हणाले.

या सभेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष रणजित देसाई, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, युवराज लखमराजे भोसले, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, तालुका अध्यक्ष संतोष राऊळ, शहर अध्यक्ष सुधीर आरीवडेकर, संयोजक प्रमोद रावराणे, राजेंद्र म्हापसेकर, प्रज्ञा ढवण, संध्या तेरसे, अशोक सावंत, प्रमोद कामत, राजू राऊळ, पुखराज राजपुरोहित, संजू शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रभाकर सावंत, पुखराज राजपुरोहित, संध्या तेरसे, सावंतवाडी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ, प्रा. डॉ. गणेश मर्गज, पत्रकार प्रा. रुपेश पाटील, डॉ. पूजा कर्पे यांनीही आपले विचार मांडले. जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी स्वागत केले, तर संयोजक प्रमोद रावराणे यांनी प्रास्ताविक केले.