भाजपचं ‘बूथ विजय अभियान’

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 04, 2024 15:30 PM
views 117  views

सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टीतर्फे महायुतीत लढल्या जात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून राज्यभर ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री. अविनाश पराडकर पत्रकारांशी बोलताना दिली आहे. यांनी दिली. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने काश्मीरमधील ३७० कलम हटवण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ अभूतपूर्व नव्हे, तर भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचा सन्मान करणारा आहे. हा निर्णय घेतल्यास देशात रक्ताचे पाट वाहतील अशा धमक्या देणाऱ्या फुटीरतावाद्यांच्या दहशतीला मोडीत काढत राष्ट्रहिताशी कोणतेही तडजोड केली जाणार नाही, हा संदेश मोदी सरकारने त्यातून दिला. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी आणि असंख्य भारतीयांच्या बलिदानाचा सन्मान करत कलम ३७० हटवत मोदी सरकारने आपला राष्ट्रीय अजेंडा स्पष्ट केलाच आहे. 

म्हणून ३७० या अंकातून भाजपाच्या सरकार प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या सरकारच्या पाठीशी रहात "फिर एक बार -भाजप सरकार"चा नारा जनता देऊ लागली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसभेतही मोदींना समर्थन देत महायुतीच्या उमेदवाराचा विजय हा निव्वळ विजय नव्हे, तर तो ऐतिहासिक विजय असला पाहिजे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाने केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, लोकसभा निवडणुक प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी नेत्यांच्या उपस्थितीत नुकताच पुढील ३५ दिवसात प्रत्येक बुथपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार, प्रदेशाच्या सुचनेनुसार प्रत्येक बुथवर  ‘बूथ विजय अभियान’ अंतर्गत मागच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून याद्वारे  महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे श्री अविनाश पराडकर यांनी सांगितले.   

‘बूथ विजय अभियान’ अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्य़ाचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर  विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंड़ा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवावर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील. अगदी ज्या मतदारांची भूमिका आज भाजपाविरोधी असेल, अशा मतदारांपर्यंतही पोहोचत त्यांना मोदी सरकारचे कार्य ,  योजना पटवर भाजपाला मत देण्यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मतदानापासून दूर रहाणा-या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल. 

भाजपा प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर म्हणाले आहेत की बूथ समिती व पन्ना प्रमुखांची नियुक्ती, तसेच १०० हून अधिक जणांचा व्हॉट्स ॲप ग्रूप बनवण्यात येईल .प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कार्यकर्ते व पन्नाप्रमुखांचे संमेलन घेण्यात येणार असून संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या त्या बूथनुसार महायुतीकडे यावेळी मतांची टक्केवारी किती असायला हवी, तसेच मागच्या ३ निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी व आवश्यक माहिती देण्यात येणार आहे.संमेलनामध्ये बूथ समिती व पन्ना प्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चाही होतील असे श्री अविनाश पराडकर यांनी सांगितले.