सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे विस्तारीकरण पायाभूत सुविधा आणि रेल्वे स्टेशनवर जास्तीत जास्त गाड्या थांबाव्यात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी आज दिल्ली येथे माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांची भेट घेत याबाबत सर्व मागण्यांचे सविस्तर पत्र दिले.
या पत्र्यात रेल्वे टर्मिनसच्या कामाची पार्श्वभूमी, सद्यस्थिती व रेल्वे स्टेशन वरील गाड्या न थांबल्यामुळे होत असलेल्या प्रवाशांच्या अडचणींबाबत माहिती दिली. शरद पवार यांनी याबाबत सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेत हे काम अद्याप पूर्ण न होण्याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी तसेच स्टेशनवर करावे लागणाऱ्या विविध उपायोजना, गाड्यांना थांबे देण्याबाबत सर्व गोष्टींची माहिती घेतली. तसेच या प्रश्नात लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्र्यांसोबत समवेत चर्चा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.