वैभववाडी : मुंबईतील २६//११ च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या विजय साळसकर यांचे स्मारक अखेर दिव्यांनी झळाळले. मनसे पदाधिकारी गणेश कदम यांनी स्वखर्चाने सोलर लाईट लावल्या. काळोखात असणाऱ्या या स्मारकाच्या ठिकाणी लख्ख प्रकाश पडला. श्री. कदम यांनी शहीदांप्रती केलेल्या या कार्याचे कौतुक सर्वांकडून होत आहे.
मुंबईतील गुंडाराज संपविणारे पोलीस दलातील अधिकारी शहीद विजय साळसकर यांचे स्मारक त्यांच्या मुळ गावी एडगाव येथे बांधण्यात आले आहे. या स्मारकाच्या ठिकाणी वीजेची सोय नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधारच असे. ही बाब मनसेचे वैभववाडी तालुक्याचे पदाधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी श्री. कदम यांच्या कानावर घातली. त्यांनी याबाबत तात्काळ सोलर लाईट बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या ठिकाणी तीन सोलर लाईट बसविण्यात आल्या. त्यामुळे अंधारात झाकोळला हा परिसरात लख्ख प्रकाश झाला आहे. श्री. कदम यांनी केलेल्या या कामाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.