भाजपच्या स्वयंघोषित नेत्यांनी किती कामं आणली ? : अमरसेन सावंत

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 23, 2023 10:48 AM
views 348  views

कुडाळ : भाजपला खरोखरच कामे मंजूर करावयाची असती तर  मार्च २०२३ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन व हिवाळी अधिवेशन २०२३ च्या पुरवणी मागण्यांमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपच्या स्वयंघोषित नेत्याने किती कामे कुडाळ मतदारसंघात आणली ? कणकवली आणि सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येकी १०० कोटी मंजूर झाले असताना कुडाळ मतदारसंघात एकही रुपया देण्यात आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. हीच भाजपच्या स्वयंघोषित नेत्याची ताकद आहे का ? मठ, कुडाळ, पणदूर, हुमरमळा, जांभवडे, घोटगे ग्रा. मा. १७९ या रस्त्याचे भूमिपूजन पालकमत्र्यांना करायचे असल्यास त्यांनी या रस्त्यासाठी काय प्रयत्न केले हे त्यांनी जाहीर कराव, त्याचे पुरावे द्यावेत असे आव्हान उबाठा सेनेचे उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केले आहे.

तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे रा. मा. १७९ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात  बजेट २०२१- २२ अंतर्गत ३ कोटी ६० लाख रु मंजूर केले. आज या रस्त्याचे भुमिपूजन आ. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत म्हणाले, कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे ग्रा. मा. १७९ या रस्त्याच्या कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात  बजेट २०२१- २२ अंतर्गत ३ कोटी ६० लाख रु मंजूर केले आहेत. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र त्यानंतर सत्तांतर झाल्याने शिंदे-फडणवीस सरकारने या विकास कामासह आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील अनेक विकास कामांना स्थगिती दिली होती. स्थगिती उठविण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी सरकारकडे वारंवार मागणी केली. मात्र ५० खोक्यांसाठी आ.वैभव नाईक शिंदे गटात गेले नाहीत म्हणून  विकास कामांवरील स्थगिती कायम ठेवण्यात आलीत्यामुळे नाईलाजाने आ. वैभव नाईक यांना शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली.

त्याअनुषंगाने  विकास कामांवरील स्थगिती उठविण्याबाबतचे एफिडेव्हिट सरकारने न्यायालयात सादर केले. कोर्टामार्फत विकास कामांवरील स्थगिती उठविण्यास सरकारला भाग पाडण्यात आले. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी ही स्थगिती उठविल्याचे परिपत्रक काढले. या कामांना सुरुवात करण्यात येत आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात अशी अजून जवळपास १०० विकास कामे असून त्यावरील स्थगिती कोर्टाच्या आदेशामुळे उठली आहे.त्याचीही भूमिपूजने लवकरच होणार आहेत. मात्र कामे थांबविण्यासाठी भाजप पदाधिकारी विकास कामाच्या भूमिपूजनात अडथळा निर्माण करून गुंडशाही करत आहेत. मात्र अशी गुंडशाही आ.वैभव नाईक यांनी अनेक वेळा झेलली आहे.जनतेच्या हिताचे काम करताना अशा गुंडशाहीला ते कधीच थांबणार नाहीत. त्यांचे काम कोणीही रोखू शकत नाही. आ. वैभव नाईक ज्या कामांची भूमिपूजने  करीत आहेत ती कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेली आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने लावलेली स्थगिती कोर्टाच्या आदेशामुळे नाईलाजने त्यांना उठवावी लागली आहे असं श्री. सावंत म्हणाले.