सोशल मीडियामुळे मराठी कविता उथळ होत गेली : अजय कांडर

Edited by:
Published on: August 23, 2024 07:34 AM
views 112  views

कणकवली : आजच्या सोशल मीडियाच्या काळात मराठी कविता अधिक उथळ होत गेली असताना गंभीरपणे काव्य लेखन करणाऱ्या कवींना नांदगाव किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कविवर्य नारायण सुर्वे आणि कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे; ही महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे. आता साहित्यासह सर्वच कला संस्कृतीच सपाटीकरण वाढत जात असतना गंभीरपणे सांस्कृतिक काम करणाऱ्या माणसांच्या मागे चांगल्या रसिकांनी राहिले पाहिजे. असे प्रतिपादन नामवंत कवी आणि स्तंभलेखक अजय कांडर यांनी तोंडवली येथे केले.

नांदगाव किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे आणि कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कार सोहळा कवी कांडर यांच्या अध्यक्षतेखाली तोंडवली सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना कांडर यांनी नांदगाव सारख्या छोट्या भागात मोरजकर ट्रस्ट चांगले सांस्कृतिक काम करत आहे. याची दखल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात घेतली जाईल. माणसांची मन संकुचित होत गेली असून अशावेळी चांगलं साहित्यिक काम करणे गरजेचे आहे असेही आग्रहाने सांगितले. समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या आणि पत्रकार तथा असलदे विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष भगवान लोके यांनी कविता वाचन करून उद्घघाटन केलेल्या सदर कार्यक्रमात कवयित्री मनीषा शिरटावले यांना कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मोरजकर ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे वसंत सावंत, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक विनायक चव्हाण,प्राचार्य तुकाराम केदार, प्राचार्य सोनाली पावसकर आदी उपस्थित होते.

मातोंडकर म्हणाले मनीषा शिरटावले यांची स्त्री स्वातंत्र्याच्या बाजूने लिहिलेली कविता स्त्रीला एक आत्मिक बळ देते. त्यांच्या कवितेत स्त्रियांची आंतरिक घुसमट अधोरेखित होते. स्त्रियांना कायमच स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि हाच विचार शिरटवले यांच्या कवितेत दिसतो. त्यामुळे नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले ही महत्त्वाची घटना आहे. वसंत सावंत म्हणाले, असे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जायला हवेत. यासाठी आमच्या शैक्षणिक संकुलाचे कायम सहकार्य मिळेल. चांगल्या कामाला पाठबळ देणे म्हणजेच चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणं असतं.श्री वायंगणकर म्हणाले, ऋषिकेश मोरजकर आर्थिक संघर्ष करत आपल्या ट्रस्टतर्फे चांगलं सांस्कृतिक काम करत आहेत. यासाठी यापुढेही आमचे त्यांना सहकार्य राहील. तर श्री लोके यांनी मोरजकर यांच्या कामाची जेवढी दखल घेतली जायला हवी होती,तेवढी घेतली गेली नाही याबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी विनायक चव्हाण यांनीही विचार व्यक्त केले. ऋषिकेश मोरजकर यांनी प्रास्ताविक केले.राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले.