सावंतवाडी : संत गाडगेबाबा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना अनंत चतुर्थीपर्यंत बसण्याची मुदत देण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांच्यावतीने माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली आहे. दरम्यान दबाव टाकून व्यापाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न कोणी केल्यास गाठ भाजपशी आहे. प्रशासनाने हलक्यात घेऊ नये असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला.
दरम्यान मुख्याधिकारी यांनी कोणताही दबाव असल्यास सांगावे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी आपण बोलतो असे आश्वासन देखील संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. तर अनंत चतुर्थीनंतर बाजारा मोकळा करून देण्याची जबाबदारी भाजपची राहील असं ते म्हणाले.
दरम्यान, व्यापाऱ्यांनी आपल्याशी वेळोवेळी चर्चा करून मुदतवाढ घेतली. त्यामुळे आताची त्यांची मागणी लक्षात घेता आपण या संदर्भात विचार करून पुढील भूमिका ठरू असे आश्वासन देखील मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी यावेळी दिले. तर स्थलांतरबाबात व्यापारी वर्गाने सहकार्य करावं असंही ते म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नासिर शेख, अजय गोंदावळे, आनंद नेवगी, मनोज नाईक, बंटी पुरोहित, केतन आजगावकर, दिलीप भालेकर,आदींसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.