ट्रक अपघातात निधन झालेल्या सीताराम यांच्यावर अंत्यसंस्कार

Edited by: विनायक गांवस
Published on: September 18, 2024 13:21 PM
views 496  views

सावंतवाडी : तालुक्यातील निगुडे येथील सिताराम उर्फ बाबल सदाशिव चव्हाण, वय ५५ यांचे कोल्हापूर शिरगाव येथील ट्रक अपघातात निधन झाले. ही घटना सोमवारी सकाळी घडली. त्याचा मृतदेह कोल्हापुरहून निगुडे गावी आणण्यात आला. गावचे सरपंच लक्ष्मण निगुडकर, निवृत्त वायरमन चंद्रकांत निगुडकर उपसरपंच तथा ग्रामस्थांनी मंगळवारी त्याच्या निवासस्थानाहून निघालेल्या  अंत्य यात्रेत सहभागी होत निगुडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. 

अत्यंत खडतर गरीबीत बालपण गेलेले सिताराम यांनी कोल्हापूर शिरगांव येथे एका कारखान्यात नोकरी स्वीकारली होती. मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वाना आपलेसे करत. 

सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास  ते कोल्हापूर येथून गांवी यायला निघाले होते बसस्थानकाच्या दिशेने रस्त्याच्या कडेने चालत जात असताना भरधाव आलेल्या ट्रक ने त्यांना उडविल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सिताराम यांना तेथील स्थानिकांनी तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

अपघाती निधनाबद्दल सरपंच निगुडकर यांनी हळहळ व्यक्त केली. सिताराम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, बहिणी, भावोजी असा परिवार आहे.